शनिवार, १ जानेवारी, २०११

नकुसा.

जग रोज प्रगति करत आहे. रोजच काहितरी नविन शोध लागताहेत. विज्ञान उद्या काय नविन देईल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. मोबाईलही स्मार्ट होतोय. आजच्या वेगाच्या २०० पट वेगाने चालणारा संगणक लौकरच बाजारात येतोय. पण आमचा सातारा जिल्हा मुलींची नावे नकुसा ठेवतोय. वर्तमान पत्रात ही चिड आणणारी बातमी वाचली व मागासलेपण म्हणजे काय याचा उलगडा झाला.
मुलाची ईच्छा असताना मुलगी झाली तर तिचे नाव नकुसा ठेवायची पद्धत महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात आहे हे वाचुन आश्चर्य वाटले व चिडही आली.
सातारा जिल्हा परिषदेने "नकुसा" नावाच्या मुलींची मोजणी केली असता संपूर्ण जिल्ह्यात या नावाच्या २२२ मुली आढळल्या. सांगली जिल्हा परिषद या मुलींची नावे येत्या जागतिक महिला दिनाला म्हणजे ८ मार्च २०११ला बदलणार आहे.
शाळेत हजेरी देताना आम्हाला लाज वाटते असे या मुलींचे म्हणणे आहे. हो लाज वाटणारच. आपल्याला कसे माय-बाप मिळालेत याची या मुलींना नक्किच लाज वाटत असेल. स्वत:ची लाज वाटावी असे या मुलींनी काय केले ?

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - ३

यापुर्वीचे लेख शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

                       शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

        इयत्ता आठवी पासुन शासनाने सर्व प्रकारच्या शालेय (जसे महाराष्ट्र बोर्ड, CBSE व ICSE)  विद्यार्थ्याची माहिती उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, लिंग, दरवर्षी वार्षिक परिक्षेतील गुण,  पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमचा पत्ता,  वडिलांचे नोकरीचे ठिकाण, कुठे नोकरी करतात त्या कंपनीचे नाव वा शक्य झाल्यास अधिक माहिती गोळा करावी. हि सर्व माहिती शाळेनेच शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करावी. शासनाने हि माहिती अपलोड करण्यास तसेच बदलण्यास सर्व शाळेच्या व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना अधिकार द्यावेत. हे अधिकार मुख्याध्यापकांना व प्राचार्यांनाच असल्याने त्यात चुका वा चुकीची माहिती देण्याचा कल कमी होईल व झेरॉक्सचा होणारा खर्च पण कमी करणे शक्य आहे.
         दहावीच्या परिक्षेनंतर लगेचच मुलांनी आपल्या शाळेत जाऊन आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमाला जायचे आहे याची माहिती शाळेत द्यायची. म्हणजे शालांत परिक्षे नंतर त्या माहितीच्या आधारे शासनाने विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळचे महाविद्यालय द्यावे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पर्याय देण्यात यावेत. यापैकिच्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे त्याला बंधनकारक असावे. अशाप्रकारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कमितकमी वेळात पूर्ण करणे शक्य आहे व अकरावीचे वर्गही जून किंवा जुलै महिन्यात सुरु होऊ शकतात.
            अकरावी सारखेच पदवी महाविद्यालयांचे प्रवेशही याप्रकारे राबवता येतील.
          यादरम्यान परराज्यातुन कोणी विद्यार्थी आल्यास त्याला त्या त्या वेळच्या शाळेत किंवा महाविद्यालयात सामावून घेताना तेथील प्राचार्य त्याची माहिती अपलोड करू शकतात.
          याच माहितीचा उपयोग नोकरीसाठी अर्ज करताना केला जाऊ शकतो. अर्ज करताना अर्जदाराला आपल्या गुणपत्रिकेची नक्कल न जोडता आपला या सर्व्हर वरचा क्रमांक द्यावा लागेल ज्या कंपनीला ही माहिती हवी आहे त्या कंपनीने शासनाला या माहितीचा वापर करण्यासाठी काही ठराविक शुल्क द्यावे. याप्रकारे शासनाला ही सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी होणारा खर्चही कमी करता येईल.
            या पद्धतीचे बरेच फायदे आहेत.
१ विद्यार्थ्याला अकरावी व महाविद्यालयीन प्रवेश घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
२. सर्व माहिती शासनाने गोळा केलेली असल्याने त्याला वेगवेगळ्या दाखल्यांची गरज लागणार नाही.
३. सर्व माहिती प्राचार्यांनी तपासलेली असल्याने वेगळ्या तपासणीची गरज भासणार नाही.
४. फोटोकॉपी काढण्यास होणारा खर्च कमी करता येईल.
५. विद्यार्थ्याला घरबसल्या सर्व व्यवहार करता येतील.
६. जवळचे महाविद्यालय मिळाल्याने होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल व रेल्वे तसेच बस मधिल विद्यार्थ्यांची गर्दी कमी होईल व त्यांचा त्रासही.

शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

संभ्रम.

ब्लॉगची सुरुवात तर छान झाली. पहिल्या काही दिवसातच भेटींचा १००० आकडा पार झाला. शुभेच्छा देणारे बरेच संदेश मिळाले त्यामुळे उत्साह वाढला असतानाच रोजच्या भेटींचा आकडा मात्र उत्साह मावळायला खतपाणी घालुन गेला !
मागच्या महिन्यातली व्यस्तता ब्लॉग कडॆ दुर्लक्ष करायला चांगले कारण देऊन गेला. जरा वेळ मिळाल्यावर बघितले तर आकडा फारच संथपणे वाढतोय व येणार्‍या प्रतिक्रीया मात्र शुन्य. बहुतेक वाचकांना माझे लिखाण आवडले नसावे (?) किंवा सातत्याने न लिहील्याची ही वाचकांनी दिलेली शिक्षा किंवा लेखांचे विषय मायबाप वाचकांच्या आवडीचे नसावेत.
कारण काहिही असले तरी लिहीण्यात सातत्य नाही हे मी मान्य करतो व या पुढे लिहीण्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतो.
माझा उत्साह कायम रहावा यासाठी वाचकांनी प्रतिक्रीया द्याव्यात ही विनंती.
परत उद्या भेटूच.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या सोडवण्यासाठी मुख्यत: काही बाबींचा विचार केल्यावर खालील समस्या प्रकर्शाने जाणवल्या.
१. प्रवेश अर्ज विकत घेणे.
२. अर्ज भरल्यावर तो संबंधित महाविद्यालयात जमा करणे.
३. अर्ज जमा केल्यावर महाविद्यालयात जाऊन गुणवत्ता यादी बघणे.
४. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळे पर्यंत प्रवेश घेणे व रद्द करणे यात बराच पैसा वाया जातो.
     वरिल चारही बाबतीत विद्यार्थ्याला व सोबत पालकांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते जे सर्वांनाच गैरसोयीचे आहे. कारण यात बराच वेळ उगाचच वाया जातो व एखाद्या विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त महाविद्यालयात अर्ज करायचा असेल तर त्याला तितक्याच जास्त महाविद्यालयात रांगेत उभे रहावे लागते.
     प्रत्येक अर्जासोबत सत्य प्रतिलीपी जोडावी लागते ज्यामुळे त्याला झेरॉक्सचा नाहक भुर्दंड पडतो.
    प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्याचा जीव टांगणी वर असतो ज्यामुळे त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
   या संगणकाच्या युगात शासनाने आठव्या वर्गापासुन जर शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती गोळा करुन ठेवली व महाविद्यालयीन प्रवेशा वेळी संबंधित महाविद्यालयांना ती माहिती पुरवण्यात आली तर कोणताही अर्ज न भरता सर्व महाविद्यालयांना प्रवेश देणे सोयीचे होईल. या पद्धतीत कागदाचा होणारा वापरही कमी होईल व ते पर्यावरणाच्या पण हिताचे असेल.
(शासन कशाप्रकारे ही माहिती गोळा करु शकते व त्याचा वापर कसा करता येईल हे पुढील लेखात.)

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्‍हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी.

सर्वप्रथम या माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची जावो हि शुभेच्छा.
काल मुलीची परिक्षा संपली. शाळेतुन तीला घरी आणताना मी नेहमी थोडा तयारीतच होतो, आज परिक्षा संपली चला आता मला फटाके घेऊन द्या अशी मागणी आल्यास तीला नाराज न करता सरळ तिच्या सोबतच दुकाना गाठायचे व म्हणेल त्यातले आवाज कमी करणारे फटाके घेवून द्यायचे हा सरळ हिशोब मी केला होता. पण तिने घरी आणे पर्यंत काही म्हटले नाही. त्यामुळे कपडे बदलून मी छान झोप काढली. उठल्यावर संकट आले तर माझी तयारी होतीच ! उठल्यावर बराच वेळ TV पहात आमच्या गप्पा झाल्या. बाहेर इतर मुलांचे फटाके उडवणे सुरु झाले, मी वाटच बघत होतो. बराच वेळ झाल्यावर मी मुलीला विचारले तुझी तब्येत बरी आहे ना ? ती हो म्हणाली ! परत थोड्या वेळाने मी दोन तीनदा हाच प्रश्न विचारला. तिनेही शांतपणे माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. तिला कळेना बाबांना काय झाले, त्यामुळे रात्री जेवताना तिने डाव साधला व मलाच उलट प्रश्न केला, "बाबा तुमची तब्येत बरी आहेना ?" म्हटले का ? तर म्हणे तुम्ही शाळेतन आल्यापासुन मला हाच प्रश्न विचारत आहात ना ! आता मी विचारला तर काय झाले ?
आज सकाळी मीच तिला म्हटले चल आपण थोडे फटाके आणुया. आणि तिचे उत्तर ऎकून  मला आश्चर्याचा धकाच बसला, "नाही आणायचे" मी म्हटले का ? माझ्यावर काही राग आहे का ? तर म्हणे यावर्षीपासुन फटाके नाही उडवायचे कारण त्यामुळे आवाजाचे व हवेचे प्रदुषण होते, त्यामुळे फटाके बंद.
खरच, नविन पिढीला फक्त नावेच ठवणार्‍या माझ्या सारख्याला धक्का नाहीतर काय बसणार ? धक्क्यातुन सावरल्यावर मात्र जाणीव झाली, माझी मुलगी आता मोठी झाली आहे व समंजस पण ! आजपर्यंत मी शिकवत होतो आता मात्र मला शिकवायला माझीच मुलगी तयार झाली आहे. त्यामुळे आमची ही दिवाळी फटाक्यांशिवाय होणार !

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मोह !

परवा चतुर्थीला टिटवाळ्याला गेलो होतो. बरेच दिवसात जायचे होते. अचानक जोड्याने जायचा योग आला !  दर्शनाला तोबा गर्दी आणि मोठ्ठी रांग. गणपतीच्या कृपेने पायाने त्रास अजिबात दिला नाही. संपूर्ण रांगेने जात त्या चक्रव्युहातुन बाहेर पडायला एक तास लागला. गर्दीतही दर्शन छान झाल्याचा आनंद झाला.
मंदिरात जाताना गर्दीच्या काळजीने सरळ लोकलमधुन उतरुन बाहेर पडलो, कुठेही न पहाता थेट दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शन घेतल्यावर मात्र परत यायची घाई नसल्याने डोळे उघडे ठेवून निघालो आणि टिटवाळा स्टेशन अगोदर "अनंत हलवाई"चे दूकान दिसले. काय वर्णावा तो आनंद. खरतर माझ्या पोटाच्या वाढलेल्या घेराला तेच जबाबदार आहेत. चांगले खायची सवय या अनंत हलवाईच्या कल्याणच्या दुकानानेच मला लावली !
मागच्या महिन्यात पायाला झालेल्या इजेने, थोडे खाण्यावर ताबा ठेवा हा डॉक्टरचा सल्ला महिनाभर इमाने इतबारे पाळतोय मात्र परवा "अनंत हलवाई" हा दूकानावरचा बोर्ड बघुन, डॉक्टरच्या सल्ल्याकडे थोडे दूर्लक्ष केले. बरेच दिवसांनी त्यांच्या कडचे काही खायला मिळणार होतेना ! अनंत हलवाईंचे श्रीखंड, हलवा, पेठा, जिलेबी, ढोकळा, पेढा असे किती तरी पदार्थ आहेत ज्यांना मी कल्याण सोडल्या पासुन खरोखरच मुकलोय ! तरिही कोणत्याही कामासाठी कल्याणला गेलोतर माझी अनंत हलवाईला भेट असतेच. चांगले पंधरा दिवस पुरतील इतका साठा घेऊन येतो व त्यानंतर दोन महीने घरी बोलणे खातो !
अनंत हलवाई कडील पदार्थांसोबतच मला जीभेवरचा ताबा सोडायला लावणारा पदार्थ म्हणजे कचोरी. कचोरी म्हणताच चांगली फुगलेली कचोरी डोळ्यापुढे येते, त्यात छान चटणी टाकून थोडी शेव भरुन खाणे एक छान पद्धतशीर कार्यक्रम असतो. पण नागपुरला जाताना येताना शेगावला गाडी थांबताच शर्माजींची स्टेशनवर मिळणारी कचोरी मी कधिच चुकवत नाही.
शर्माजींनी आपली कचोरी ठाण्यातच उपलब्ध करुन दिल्याने माझी बर्‍यापैकी सोय झाली आहे. त्यांचे दुकान गावदेवी मैदाना जवळच आहे. स्टेशनपासुन अगदी हाकेच्या अंतरावर !
संध्याकाळी फिरायला फार लांब जायचे नसेल तर राम मारुती रोडवर जायला मला आवडते. या रस्त्याच्या एका टोकाला संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तर दुसर्‍या टोकाला समर्थ भांडार, समर्थ भांडारा जवळच पोटाची घेरी वाढवायला एक उत्तम ठिकाण आहे "राजमाता", येथील वडापाव वा समोसा मला आवडतो पण मला त्यापेक्षा जास्त आवडते त्या जवळच असलेले राजमाताचेच मसाला कोकम सोडा. मला याचा मोह आवरतच नाही.
पुढच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे घरचे पदार्थ असतीलच, डॉक्टरांचा सल्ला डावलता येणार नाही पण घरच्या पदार्थांना न्याय तर द्यायलाच हवा ना !

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - २ शाळा.

समाजात घराबाहेर पडल्यावर पहिला संबंध येतो तो शाळेचा. शाळेतच मुले अभ्यास, खेळ, सामान्य ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे सर्व शिकतात. शाळेतील दिवस कोणत्याही माणसाला न विसरता येणारे असतात. एखाद्या लहान मुलासमोर त्याच्या शाळेला नावे ठेवून बघा, त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असते, त्याच्या प्रतिक्रियेतच त्याचे त्याच्या शाळेबद्दलचे भावविश्व दिसते. त्यामुळेच शाळेला नावे ठेवलेली मुले सहन करु शकत नाहीत.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे पुर्वी एका वर्गात ३५ ते ४० मुले असायची तर आज ही संख्या बरीच वाढली आहे, काही ठिकाणी ६० ते ७० मुलेही वर्गात आढळतात.
३५ ते ४० मुले असलेला वर्ग सांभाळणे, वर्गाला शिकवणे व हे करत असताना शिक्षक त्या मुलांच्या जीवनात एक महत्वाचा भाग होऊन जायचा.  त्यावेळेस शिक्षक हा शिक्षकच असायचा. त्यामुळेच त्याला तसे करणे सोपे जायचे.
आज ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या गराड्यात शिक्षक आपल्या कामाला न्याय देवू शकत नाही. त्यात त्याला जर निवडणुका ते जनगणना असे कार्यक्रम दिलेत तर, शिक्षकाने आपला अभ्यास कधि करायचा ? केलेल्या अभ्यासावर चिंतन कधि करायचे ?
शिक्षक व्यस्त व त्रस्त आणि विद्यार्थी मोकाट.

शिक्षकाला असली कामे देण्याने तो आपल्या दैनंदिन कामात लक्ष घालु शकत नाही. त्यामुळे वर्गाकडे होणार्‍या दुर्लक्षाचा गैरफायदा मुले उचलतात. अभ्यास न करणे व शालेय विद्यार्थ्याने करु नये असे बरेच उपद्व्याप शाळेतील मुले करताना दिसतात जसे वर्गातील मुलींना छेडणे, असभ्य शब्दांचा वापर, पालक तसेच शिक्षकांबद्दल अर्वाच्य शब्दांचा वापर इ. त्यामुळेच तीसर्‍या वर्गातला मुलगा आपल्या वर्गमित्रावर कात्रीने वार करु शकतो.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - १ :

घरी दोन तीन भाऊ बहिण, शेजारीच काका काकू, चुलत भाऊ बहिण, पलिकडे जुने वडिलांचे स्नेही ज्यांना काकाच म्हटले जायचे, शाळेत वर्गात ३५/४० मुले/मुली शिक्षकांना सर्वांची नावेच नव्हेत तर घरी कोण आहेत याची माहिती असायची, अशा वातावरणात मुलांकडे / मुलीकडे लक्ष देणारे बरेच असायचे. त्यामुळे जरा काही वाकड वागल तर घरी संध्याकाळी पाठिवर फटाके फुटायचे, शिमगा व दिवाळी एकाच दिवशी !
जरा मोठे झाल्यावर न कळणारी पण शासनाच्या कृपेने सर्वत्र झळकणारी जाहिरात बघायला मिळायची, "छोटे कुटूंब सुखी कुटूंब". पत्र्यावर छापलेली व भिंतीवर गेरुने रंगवलेली हि जाहिरात त्यावेळी हमखास दिसायची.
छान होते ते दिवस. फारशा सोयी नव्हत्या पण सर्वच सुखी दिसायचे. सणासुदीला घरी जेवायला कुणीतरी असायचेच. मजा यायची त्या पंगती बघताना. कधितरी त्या पंगतीत वाढायला मजा यायची. पुढे पुढे हे सर्व कमी झाले. सख्खेच लांबच्या गावाला नोकरिला. गावात फक्त आई वडिल आणि दोन बछडे, हाच संसार, हेच विश्व. कालांतराने आई पण घर खायला ऊठते म्हणुन किंवा शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणुन नोकरिला.
आईच्या हातचे फक्त सणाला, इतर वेळेस शेजारच्या वाण्याकडून मॅगी आणले कि दोन मिनीटात तयार, घरी कंटाळा आल्यावर मित्रांसोबत खेळायला मजा यायची. त्यानंतर एका मोठ्ठ्या राक्षसाने घराघरात प्रवेश केला पण हा राक्षस संध्याकाळी काहिच वेळ दिसायचा त्यामुळे सर्वांचे लक्ष घड्याळाकडे असायचे. हा TV  नामक राक्षस काही वेळ खाऊन बंद व्हायचा, चांगली करमणुक करायचा. काही वर्षांनी या राक्षसाने आपली पकड अधिकच घट्ट केली. जेमतेम चार तास खाणारा हा राक्षस चोवीस तास घरातच रहायला लागला. तेथेच समाजजीवनाच्या बदलाची सुरुवात झाली. मुलांचे घराबाहेर खेळणे कमी झाले व TV समोरचा वेळ वाढायला लागला. समोर  कुरकूरे व TV, येथेच आयुष्याच्या कुकूरीने पण सुरुवात केली. चोवीस तास TV वर काय दाखवायचे ? हा एक मोठ्ठा पश्न निर्मात्यांपुढे. ते तरी काय करणार. हा प्रश्न सोडवायला त्यांनी पण अतिशय आक्रमकतेने आपले कार्यक्रम राबवणे सुरु केले. पोट भरायला प्रतिस्पर्ध्या पुढे रहायला हवेच यातुनच या TV चॅनल्सचा आक्रस्ताळेपणा वाढायला लागला. बातमी कशा प्रकारे कव्हर करायची याला धरबंध राहिला नाही व मालिकां मध्ये तोचतो पणा जाणवायला लागला. रियालिटी शो ने तर सर्वच बंधने झुगारलेली दिसतात.

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०१०

हजारे.

मला माहितेय मी फार चांगला लेखक नाही. पण लिहून बघायला काय हरकत आहे या विचाराने हा ब्लॉग सुरु केला. लिहीता आल तर ठिक अन्यथा एक दिवस बंद करणे आपल्या हातात आहे ना ! माणुस असल्याने मलापण भावना आहेतच, त्याच भावना येथे उतरवतोय. वाचकांना आवडल्यास नक्किच टिप्पणी देतात न आवडल्यास तसेही सांगतात. यामुळे इतरांचे विचारही कळतात. आपले विचार चुकिचे असल्यास बदलायला तितकाच वाव.
या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली ४ जुलै २०१० ला. वाटले नव्हते कि वाचकांचा १०० आकडा पार करेल. पण आजचा १०००+ आकडा बघितला व चांगले वाटले. फार समाधान नाही कारण काही मोजक्याच प्रतिक्रीया मिळाल्यात. प्रतिक्रीया कमी असल्याने मी जे लिहीतोय ते इतरांना आवडते की नाही हे कळायला मार्ग नाही.
१००० चा आकडा गाठायला ज्यांची मदत झाली त्या सर्वांचे मनापासुन आभार !

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

मिडिया !

शेकडो चॅनल्स सर्फ करत असताना आपल्याला आवडेल असे काही दिसत नाही व उगाच आपण मिडियाच्या नावाने बोटे मोडत बसतो. मालिका असो किंवा बातम्या, नको नको ते दाखवले जाते. घरात वा समाजात कधिही न दिसणारी भांडणे किंवा भानगडी हे सर्व आपण कोणत्याही मालिकेत बघु शकतो. कालच कुठली तरी हिंदी मालिका बघत असतांना त्यातील कलाकार ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करित होते ते बघुन तर चॅनल बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. बातम्यांची पातळी तर बोलूच नये इतपत घसरलीय. चॅनल सुरु केले आहे तर ते चालवावे लागेल तर दाखवा जे काही शक्य आहे ते अशिच बहुदा मानसिकता असावी या चॅनल मालकांची.  TRP के लिए कुछ भी करेगा !
रेडिओ लावावा तर तेच, रेडिओ जॉकि नावाची नविन जमात असंबद्ध बडबड करण्यात तरबेज असते. मनात येईल ते वाट्टेल तितके बोलायचे व आपली वेळ संपली कि पुढच्याला बडबडण्यासाठी खो द्यायचा. हे सर्व चोवीस तास चालु द्यायचे.
समाजातही या सर्व मालिकांचे दुष्परिणाम दिसतात पण एक चांगला परिणाम पण झालाय ! ह्या शेकडो चॅनल्सना लागणारा कामगार वर्ग. एक चॅनल किमान दोनशे जणांच पोट भरते. एक मालिका तयार करताना स्पॉट बॉय पासुन सर्व कलाकार यांची संख्या २५० च्या वर जाते.  सर्व चॅनल्स धरलेत तर कमितकमी दोन ते तीन लाख माणसांचे पोट यावर अवलंबून आहे.
तर मालिका, बातम्या बघा अथवा बघू नका या सर्वांचे पोट भरतेय यात आनंद माना !

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

रक्तदान.

परवा रविवारी संध्याकाळी फिरायला जाताना रस्त्यातले खड्डे चुकवता चुकवता एका बेसावध क्षणी एका खड्ड्यात पाय पडला ! पाय पडताच तो मुरगळला, त्यामुळे गेले तीन दिवस पाय दुखीने त्रस्त होतो व आज कॉलेजला गेलोच नाही. सहसा मी सकाळी email चेक करायच्या भानगडीत पडत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर ते काम निवांत करता येते. आज घरी असल्यामुळे सकाळी ई-मेल बघायला बसलो तर त्यात Indianblooddonors ची मेल बघितली. माझा बदललेला मोबाईल क्रमांक त्यांना कळवलेला नसल्याचे आठवले व त्या प्रमाणे नविन क्रमांक त्यांच्याकडे रजिस्टर केला.
श्री. खुश्रु पोचा
http://www.indianblooddonors.com/ ही साईट नागपुरच्या खुश्रु पोचा व त्यांच्या पत्नि दोघे चालवतात. १९९९ मध्ये रक्त न मिळाल्याने त्यांना एका दुखद प्रसंगाला सामोरे जावे लागले, त्यानंतर दोघांनी ही साईट सुरु करुन आपले सर्वस्व, कुणाला रक्त न मिळाल्याने अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागु नये यासाठी अर्पण केले व आज पर्यंत अनेकांना या सेवेचा लाभ झाला आहे. (पोचांबद्दल परत कधितरी लिहीन.)
माझा नविन मोबाईल क्रमांक त्यांना कळवताच एक SMS आला, परत रक्तदान करणार का ? मी हो असे उत्तर देताच थोड्यावेळातच एक फोन आला, आपण रक्तदान करायला तयार आहात असे आपण कळवले आहे आत्ता येत असाल तर चांगले होईल. मी येतो म्हणताच त्यांनीच सांगितले एका दिड वर्षाच्या मुलीला रक्ताची तातडीची गरज आहे कारण तिला Thalassemia झालेला आहे व तिला रक्त देणे गरजेचे आहे.
नियमीत रक्तदाता असल्याने रक्त देणे इतकेच माहित होते. ते कुणाला देण्यात येणार याचे मला काही कर्तव्य नव्हते. पण आज दिड वर्षाचे वय ऎकताच राहवले नाही व परत एकदा रक्तदानाचे पुण्य कमावता आले.
रक्तदान काही तथ्ये:
१. १८ वर्षाच्या वर असलेला व ५० किलोच्या वर वजन असलेला कुणीही रक्तदान करु शकतो.
२. आपल्या अंगात सुमारे ६ लिटर रक्त असते, त्यातील फक्त ३५० मिली रक्त काढण्यात येते जे पुढील ४८ तासात परत तयार होते.
३. रक्तदान केल्याने कोणताही थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही.
४. रक्तदान केल्यावर परत रक्त तयार होण्यासाठी कोणतेही औषध घ्यावे लागत नाही.
५. रक्त अतिशय सुरक्षीत पद्धतीने काढण्यात येते.

तर बघा आपले रक्त कुणाच्या कामी आले व त्याचा जीव वाचवता आला तर.

SMS Now ! A Life Depends on it.


Want to Donate Blood

SMS BLOOD (Std Code) (Blood Group) To 09665500000
 
Need Blood Donors


SMS DONOR (Std Code) (Blood Group) to 09665500000

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

व्यवस्थापन कला कि शास्त्र ?

  गरज हि शोधाची जननी असते अस म्हटल जाते. बर्‍याच अंशी हे खर आहे. प्रश्न पडल्यावरच तर उत्तर शोधणार ना !
 एकदा जपान मध्ये एक माणुस काही घरघुती सामान घ्यायला गेला. त्याच्या वस्तुंमध्ये अंगाच साबणही होत. त्याने शेल्फ मधुन साबणाचा पॅक काढला व बास्केट मध्ये घातला. बिल देताना काऊंटरवर लक्षात आले कि साबणाच्या त्या पॅक मध्ये साबणच नाही. ग्राहकाला नविन पॅक देण्यात आला व संबंधित साबण कंपनीला झालेला प्रकार कळवण्यात आला. कंपनीला हा प्रकार कळताच एक चौकशी समिती गठीत करण्यात आली. एका अभियंत्याला त्या समितीचा प्रमुख करण्यात आले व हा प्रकार घडलाच कसा याचा शोध घेण्यास सांगण्यात आले. याशिवाय असा प्रकार परत घडू नये यासाठी उपाय सुचवायला सांगण्यात आले.

समितीने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणॆ बैठकींवर बैठकी घेण्यास सुरुवात केली.

समितीतल्या अभियंत्यांनी एक नविन मशिन बसवण्यास सांगितली  X-ray च्या आधारे सर्व पॅक बरोबर भरले आहेत कि नाहित हे त्या मशिनने कळणार होते. अशी मशिन बसवण्यास बराच कालावधी व पैसा लागेल व तो व्यवस्थापनाने मान्य करावा असेही अहवालात लिहीण्यात आले व व्यवस्थापनानेही मागणी मान्य केली.

मधल्या कालावधित कामगारांनी प्रत्येक पॅक भरला असल्या शिवाय पुढे पाठवू नये असेही सांगण्यात आले. या कसरतीत कारखान्याची उत्पादन क्षमता बरिच कमी झाली.

हा सर्व प्रकार एक कामगार बघत होता त्याने एक प्रयोग करायचे ठरवले. त्याने व्यवस्थापनाला एक पंखा द्यावा असे सांगितले. पंखा मिळाल्यावर तो पंखा त्याने साबण पॅकमध्ये भरण्याच्या मशिन नंतर असेंब्ली लाईनवर अशाप्रकारे लावला कि पंख्याच्या वार्‍याने डबा रिकामा असल्यास असेंब्ली लाईन वरुन उडून बाजुला पडेल.

अशा प्रकारे कंपनीचा बराच पैसा वाचवल्याचे बक्षिस त्या कामगाराला देण्यात आले.

रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

अबब !

आज संध्याकाळी घरी आल्यावर चहा वगैरे आटोपून ई-मेल बघायला बसलो. तब्बल ४३ ई-मेल्स बघुन पहिल्यांदा तर घाबरलोच. मला सर्व मेल डाऊनलोड करुन शांतपणे Windows Live Mail मध्ये वाचायला सोयीस्कर वाटते. सर्व मेल्स डाऊनलोड व्हायला बराच वेळ लागला, कारण बर्‍याच मेल्सला Attachments होत्या. माझ्या सर्व मेल्स Windows Live Mail मधिल सोयीमुळे वेगवेगळ्या Folders मध्ये जातात व त्याप्रमाणे सर्व ओळखीच्या किंवा Contacts मधिल लोकांच्या मेल्स मी प्रथम वाचत असतो. फार महत्वाच्या नसल्यास त्या कायमच्या बाद करणे सोपे होते. त्यानंतर इतर मेल्स वाचण्यात येतात व सर्वात शेवटी सगळ्या फॉर्वर्ड्स !!!
पण एक एक मेल बघून आनंद गगनात मावेना. एक दोन मेल्स जून्या मित्रांच्या होत्या बरेच दिवसात संवाद नसलेल्या मित्रांकडून आलेल्या मेल्स नक्किच आनंद देतात !

तीन मेल्स गणेशोत्सवामुळे, गणपतीच्या छायाचित्राच्या होत्या सोबत नेहमीचेच आवाहन, २० जणांना पाठवण्या बद्दलच, अन्यथा गणपती बाप्पा कोपणार गणपती बाप्पा इतक्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार्‍या भक्तांचे भले करणे सोडून माझ्यावर कसे कोपणार ? या मेल फॉरवर्ड न केल्याने गणपती बाप्पा नव्हे तर हे सर्व ई-मेल पत्ते गोळा करणारे व त्यानंतर ते विकणारे नक्किच कोपणार हे मला माहितेय !

फॉर्वर्ड्स मध्ये दुसरी श्रेणी कुठले कुठले इंटरनेटवरले फोटो असणारी. हे सर्व लोक असले फोटो मला पाठऊन काय साध्य करताहेत तेच जाणे. असले बरेच ओळखीच्या लोकांना मी स्पॅम मध्ये घातले आहे. यामुळे या लोकांनी पाठवलेल्या महत्वाच्या मेल्स पण स्पॅम ठरवल्या जातात. हे या लोकांना कळेल तो सुदिन !

यानंतर कधि काही खरेदी करताना देण्यात आल्यावर ई-मेल पत्ता विकणार्‍या व विकत घेणार्‍या व्यावसायीकांच्या. बहुतेक तर लगेचच Delete बटन दाबून संपवल्यात !

सर्वात शेवटी अति महत्वाच्या पराकोटीचा आनंद देणार्‍या मेल्स ! अहो असे विचारात काय पडलात. असल्या मेल्स मला फार्फार आवडतात. हजारो कोटीच्या लॉटरीचे बक्षिस देणार्‍या ! या सर्व मेल्स खर्‍या असत्या तर मी नोकरी सोडली असती व बिल गेट्सला माझ्याकडे नोकरीला ठेवू शकलो असतो !!!

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

माकड.

एक जंगल होत. त्यात एक कुत्रा रहायचा. एकदा काय झाल त्या कुत्र्याने वाघाला त्याच्याचकडे येताना बघितले. कुत्रातर घाबरलेला होता पण त्याने हिंमत करुन जवळच पडलेल हाडकू चघळायला सुरुवात केली. वाघ जवळ आलेला बघितल्यावर कुत्रा जोरात म्हणाला,"काय चवदार वाघ होता," आणि वाघाला ऎकू जाईल इतक्या मोठ्याने ढेकर दिली.
वाघाने त्याचे ऎकले व म्हणाला,"अरे हा तर वाघाला खाणारा कुत्रा दिसतोय, इथुन गेलेले बरे. उगाच जीव जाईल."
जवळच्या झाडावर एक माकड बसले होते. ते माकड सर्व बघतच होते. त्याला वाटले आपण सर्व खरखर वाघाला सांगीतल तर वाघासोबत मैत्री होईल व जंगलात आपल्याला कोणताही धोका रहाणार नाही.
माकड उड्या मारत मारत वाघाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावरच त्याने वाघाला पकडले व खर काय ते त्याला सांगीतले.
वाघ म्हणाला अस व्हय, बघतोच त्या कुत्र्याला आता. वाघाने माकडाला पाठिवर बसवले व दोघेही निघाले कुत्र्याच्या दिशेने.
वाघाला परत आपल्या दिशेने येताना बघून कुत्रा पुन्हा हाड चघळायला लागला. ते जवळ आल्यावर मोठ्ठ्याने ओरडला अरे किती वेळ झाला, माकड वाघाला घेऊन परत आला नाही. मला तर फार भूक लागलीय. एक चांगला वाघ खायला मिळायला हवा.



तात्पर्य : आपल्या सोबत असे बरेच माकड असतात. त्यांना ऒळखून रहावे !

सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

प्रगति ?

बरेच वर्षांपूर्वी आमच्या गावात दूरदर्शन नव्हत. गावातल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्ति कडेच फोन असायचा.  मोबाईल नावाची गोष्ट कल्पनेच्या बाहेरची होती. सामान्य माणसाची कमाई मोजकिच असायची. वाण्याच्या दुकानात लेस, कुरकूरे वा तत्सम खाद्य पदार्थांची पाकिटे दिसत नव्हती. टेप रेकॉर्डर ज्याच्या घरी तो भाव खात असे. सामान्य माणुस रेडिओची वार्षिक लायसन्स फी भरुन मोठ्या आनंदाने गाणे ऎकत असे. शेतीवाणी पासुन बातम्या ऎकणे हा त्याचा सुखाचा खुराक असायचा. तरिही तो सुखी होता.
आज मुलांना कळायला लागल की त्यांना मोबाईल हवा असतो, iPod कानाला लावूनच दिवसाची सुरवात होते, घरात २४ तास चालणारे TV चॅनल्स आहेत, करमणूकीचे हजार मार्ग आहेत, बाजारात गेल्यावर गरजेच्याच नव्हे तर बिन गरजेच्या कित्येक वस्तु खरेदी करायची ताकद आहे. आठवून बघा आपला DVD Player शेवटचा कधी वापरला होता. घरातल्या सिडी किती दिवसात वापरल्या नाहीत. साध्या सिनेमा घरातली ढेकूण, डास नको व त्यामुळे मल्टी-प्लेक्स शिवाय सिनेमा बघवत नाही. तरिही आज आम्ही सुख शोधायला भिरभिरत्या नजरेने बुवा-बाबाच्या पायाशी लोळण घालतोय.
याला प्रगती म्हणायची ?
सहजच विचार करताना मला एका काकांची आठवण झाली. त्यांच्याकडे २२०० रुपयाचा जुना मोबाईल आहे. (ते आपला मोबाईल रात्री आठ ते सकाळी आठ बंद ठेवतात. त्यांच्या मते मोबाईल फक्त संवाद साधायला वापरायला हवा. त्यात कॅमेरा काय कामाचा ?) मोबाईल बदलणे त्यांना पटत नाही. त्यामुळे जुना मोबाईल खराब झाल्यावरच ते तो बदलणार आहेत.
आपण आपल्या कडे नविनतम वस्तु असावी या अट्टाहासापायी किती वस्तु न वापरताच किंवा फार कमी वापरुन बदलतो व या सगळ्या उलाढालीत किती पैसा व्यर्थ घालवतो. बर एक वस्तु विकत घेतल्यावर लगेच महिन्यातच त्यापेक्षा चांगली नविन आवृत्ती येते व आपण परत विचार करायला लागतो अरे थोडे थांबलो असतो तर ?
सुख कशात आहे ?

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

मारबत.

इंग्रजांचा अन्याय , अत्याचार सुरु असताना लोकांनी एकत्र यावे व समाजाला त्यापासुन काही संदेश देता आलातर अधिक चांगले या भावनेने नागपुर तसेच आसपासच्या परिसरात गेली सुमारे १३० वर्षे मारबत तसेच बडग्याची मिरवणुक काढण्यात येते.
श्रावण अमावस्या म्हणजेच पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. या दिवशी काळी, पिवळी मारबत तसेच बडग्याचा, सहा ते आठ फुट उंचीचा, पुतळा कागद, बांबू व कापड वापरुन तयार करण्यात येतो. या पुतळ्यांची सकाळी सात आठच्या सुमारास पुजा करण्यात येते व मिरवणुकीने हे पुतळे गावाबाहेर नेऊन जाळण्यात येतात वा तलावात विसर्जीत करण्यात येतात. 

पिवळी मारबत
मिरवणुकीत त्या त्या वर्षीच्या सामाजिक प्रश्नांवर आधारीत घोषण्या दिल्या जातात. या घोषणा फारच मजेशिर असतात जसे महागाई वाढली तर "महागाईले घेवून जा गे मारबत."  किंवा "स्वाईन फ्लू ले घेवून जा गे मारबत." अशा मोठ्य़ाने व अति उत्साहात नारे देत मिरवणुक ढोल ताश्यांच्या गजरात नागपुरात फिरते.
नागपुर सोबतच जवळच्या गावात मारबतीची मिरवणुक निघत असली तरी नागपुरातली मिरवणुक बघायला बरीच गर्दी होते.

काळी मारबत
 

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

शिक्षक दिन.

आज शिक्षक दिन. आपल्याला शिकवण्यात जे शिक्षक आवडले त्या सर्वांच स्मरण करणे व आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणार्‍या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देणारा नसावा असे म्हटले जाते कारण पुस्तकी ज्ञान कधिही मिळवता येते पण व्यावहारिक ज्ञान योग्य वेळेसच मिळायला हवे. माणसाच्या जीवनात व्यावहारीक ज्ञानच लौकिक दृष्ट्या उपयोगी आहे.
आजच्या या शिक्षक दिनी मला माझ्या शैक्षणीक आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांचे स्मरण करणे माझे कर्तव्य समजतो. माझ्या या शिक्षकां पैकी काही शिक्षक या जगात नाहीत त्यांना माझी श्रद्धांजली वाहतो.
सर्वप्रथम मला माझ्या प्राथमिक शाळेत शिकवणारे श्री. बंसोड यांना मी कधिच विसरु शकत नाही. वर्गात शिकवताना वर्गातली शिस्त व खेळत खेळत शिकवायची त्यांची शैली मला फार आवडायची. खेळतानाच त्यांनी आमच्या कडून ज्या तर्‍हेने पाढे पाठ करवून घेतले होते ती पद्धत कायम स्मरणात आहे. शाळेत शिकवतानाच आपण समाजाच काही देण लागतो या जाणिवेने गुरुजी समाजात जमेल तसे कामही करायचे. या कामाची पावती त्यांना शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन दिली.

आमच्या शाळेतले मुख्याध्यापक श्री. पांडे हे कडक शिस्तीचे होते. त्यांचे लक्ष कायम सर्व विद्यार्थ्यांवर असायचे. कधितरी सर व्यावहारीक गोष्टीपण सांगायचे ज्या मुळे व्यवहारात एखादी चुक झाल्यास आजही सरांची आठवण येते.

माध्यमीक शाळेत गेल्यावर आम्ही थोडे मोठे झालो होतो. अभ्यासाशिवाय हुंदडण्यात व पतंग उडवण्यात भारी लक्ष, अशा वेळेस अभ्यासात गोडवा निर्माण करण्याच मोठ्ठ काम आमच्या अंजीकर सरांनी केल. गणितात व विज्ञानात आवड वाढावी यासाठी आजही अंजीकर सर कायम प्रयोग करायचे त्यामुळे माझे गणित शाळेत असताना इतरांच्या तुलनेत फारच चांगले झाले होते. अंजीकर सरांबद्दल त्यावेळेस भिती वाटायची कारण आमचे गणित चुकले तर त्यांना फार वाईट वाटायचे. त्यांना वाईट वाटू नये हे बघण्याची जबाबदारी आमची होती !

आठवी नववी व दहावी या वर्गात असताना मनापासुन शिकवणारे शिक्षक भेटले ते सर्वच माझ्या चांगले लक्षात आहेत त्यामुळे कोणा एकाच नाव घॆण हे इतरांवर अन्याय करण्या सारख होईल असे वाटते. त्याएळेसचे आमचे स्वामी सर आज आमच्या शाळेत मुख्याध्यापक झाले आहेत. वीस वर्षांनी मागच्या वर्षी त्यांना भेटण्यात खुपच आनंद मिळाला.

अकोल्याला नोकरि लागल्यावर आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री. गाडगीळ हे मला व्यवहार शिकवणारे अजुन एक शिक्षक. माणुसकी काय असते हे गाडगीळ सरांकडुनच शिकाव. सुंदर गोष्टींच खजिनाच त्यांच्याकडॆ होता.

या सर्वांची आठवण कायमच येत असते. आज शिक्षक दिनाला मी या सर्वांना कसे विसरणार ?

शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

देवदूत !

माझी देवावर श्रद्धा आहे.  देव आहे कि नाही हा माझ्यासाठी कधिच वादाचा मुद्दा नव्हता. माझ्या मते देव आहेच त्यामुळेच तर जग चाललय !
देवावर श्रद्धा असुनही मी मनासारख घडल नाही तर त्याच्यावर रागावतो, एखाद्या लहान मुला सारखा. हो, देवासमोर मी तर लहानच ना. आपली मुले नाही का आपल्यावर रागवत त्यांच्या मनाविरुद्ध केल तर. तर या रागावण्यात माझ काही चुकतय अस वाटत नाही मला.
देव स्वत: काही करतो कि नाही मला माहित नाही पण आपल्या दूतांकरवी तो नक्किच बरिच कामे करवतो. आपण त्यांना देवदूत म्हणुया.
मला सर्वात पहिला देवदूत सापडला मी आठवीत असताना. त्या वेळी पेंसिल सोलायला शार्पनर मिळत असतानाही आम्ही मात्र दाढी करायच्या जुन्या ब्लेडने पेंसिल चांगली सोलली जाते याकारणाने ब्लेडचाच वापर करित असु. कदाचित त्या वेळचे शार्पनर चांगले नसावेत. एकदा पेंसिल सोलताना ब्लेडने बोट कापल. रक्त आल व काही वेळातच रक्तप्रवाह थांबला. लहानपणी पडायची सवय असल्याने रक्त येणे यात काही नविन नव्हते. तर रक्त आपल्या गुणामुळे लगेच थांबल पण दोन आठवड्यातच हाताला प्रचंड ठणक जाणवायला लागली व आणखी काही दिवसांनी ज्या बोटाला कापल होत त्याच बोटाला फोड आले. हळूहळू हे फोड हातावर पसरायला लागले. आमचे नेहमीचे डॉक्टर त्यावेळेसच बाहेरगावी गेले होते त्यामुळे आत्याच्या सांगण्या प्रमाणे वर्ध्याला डॉक्टर वर्‍हाडपांडेंना हात दाखवला. हात बघताच डॉक्टर अस्वस्थ दिसले. काही वेळाने त्यांनी मामांना सांगीतल याच्या हाताला सेप्टीक झाले आहे व लगेच काहीतरी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांनी रोज एक या हिशोबाने वीस दिवस एक इंजेक्शन घ्यायला सांगीतल व रोज त्यांना प्रगती कळवायची होती. वीस दिवसांनी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन मी येथे करु शकत नाही. त्यांनी मला जवळ घेऊन लाडावलेल मी अजुनही विसरलो नाही. बोलतांना ते म्हणाले "देव पावला".

मधल्या काळात असेच देवदूत भेटले.

मला आजपर्यंतचा शेवटचा देवदूत भेटला २००६ मध्ये. एके दिवशी जेवण झाल्यावर माझ्या कामाच्या ठिकाणी मला चालताच येईना. तसा मी ऊभा रहात होतो पण पाऊल पुढे टाकताच चक्कर यायची व औषधे घेतल्यावरही काही प्रगती नव्हती. एक्स रे काढल्यावर आमच्या डॉक्टरांनी स्पॉंडीलिसीस झाल्याचे सांगीतले. औषधांशिवाय गळ्याला कायम अडचणीचा होणारा पट्टा (कॉलर) लावायला सांगीतला. हा पट्टा मला कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्या सारखाच वाटायचा ! हा आता माझा कायमचाच सोबती होणार असी लक्षणे डॉक्टरांच्या बोलण्या वरुन वाटायला लागली. त्यामुळे मला एक मोठ्ठा फायदा मात्र होत होता. भरलेल्या लोकल मधे मला मात्र, एखादा दयाळू, रोजच बसायला जागा द्यायचा. साधारण पंधरा दिवस कॉलर वापरल्यावर तिची सवय होण्या ऎवजी जाचच वाटायला लागला.
एक दिवस मला मंगेश नावाचा शेजारच्या कार्यालयातला कर्मचारी भेटला व म्हणाला सर हा पट्टा तुम्हाला नकोसा झालेला दिसतोय. मी तुम्हाला एका डॉक्टरांकडे घेऊन चलतो. ते डॉक्टर तुमचा पट्टा चार दिवसात घालवतील.
सतत वाढत्या प्रमाणात चक्कर येण्याने मी माझा रस्त्याने चालायचा आत्मविश्वास गमावलेला होता. सोबत कुणी असल्याशिवाय रस्ता ओलांडणे मला फारच अवघड झाले होते. सोबत सौ किंवा मुलींना घेऊनच मी रस्त्याने जात होतो अशावेळी मला भेटलेला मंगेश मला देवदूत वाटला तर काय नवल. मंगेश मला त्यानंतर डॉक्टर बेरामजींकडॆ घेऊन गेला. तपासण्या दरम्यान डॉक्टरांनी काही मोजके प्रश्न विचारलेत व म्हणाले सोमवारी सकाळी ठिक आठ वाजता परत यायच. येताना कोणालाही सोबत आणायच नाही व आणल्यास मी तुला परत पाठवणार. चालायचा आत्मविश्वास गमावलेल्या मला तर हे फारच क्रुर पणाचे वाटले ! पण सोबत मंगेश होताच. मंगेश म्हणाला सर, डॉक्टर फार कडक आहेत, ते म्हणतात तसेच वागा ! त्यामुळे माझ्या कडे इतर पर्याय नव्हता, काय करणार !
सोमवारी एकटेच जायचे असल्याने कमीतकमी चालावे लागावे म्हणुन टॅक्सीने त्यांच्याकडे गेलो. पहिल्या दिवशीचे सोपस्कार आटोपले व त्यांनी सांगीतलेले योगासन शिकुन घरी आलो. दुसर्‍या दिवशी परत उपचार झाल्यावर पट्टारुपी कुबडी त्यांच्याचकडे ठेवून घरी जायला सांगीतल. (क्रुर पणाचा अजुन एक प्रकार.) कसाबसा घरी पोहोचलो व तिसर्‍या दिवशी कुबडी शिवाय जाण्याच्या मानसिक तयारीला लागलो ! असे दहा दिवस त्यांचे उपचार आटोपल्यावर त्यांनी माझी कुबडी परत केली व पाठिवर हात ठेउन  म्हणाले याची आता तुला गरज लागणार नाही, घरी घेऊन जा व शोकेसमध्ये ठेवून दे. मला खरच आज पर्यंत माझ्या त्या कुबडीची गरज भासली नाही. चार वर्षात माझा आत्मविश्वास परत आला, इतका कि मी आता दुचाकी चालवतो. डॉक्टर बेरामजींनाही मी देवदूतच मानतो.

गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

स्वदेशी.

            भारतात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे स्वदेशी कारखानदारांनी निर्मीलेली व परदेशी कारखानदारांनी / कंपन्यांनी निर्मीलेली अशी सरळ सरळ विभागणी करता येईल. बहुतेक ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु या परदेशी कंपन्यांनी निर्मीलेल्या आढळतात त्यात सोनी, नोकिया, सॅमसंग या परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारात चांगलेच बस्तान मांडले आहे. कुठल्या प्रकारची ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला एका विशिष्ठ कंपनीचे नाव समोर येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन म्हटला कि नोकियाची आठवण आल्या शिवाय मोबाईलचा विचार करणे अशक्य आहे. तर दूरदर्शन संच घ्यायचा असल्यास सोनीचा संच आठवणारच.
          या परदेशी कंपन्यांची एक कौतुक करण्यासाराखी गोष्ट म्हणजे ते आपल्या ग्राहकांप्रती कमालिचे जागृत असतात. का नसणार त्यांना आपले दुकान वर्षानुवर्षे चालवायचे आहे ना ! तर हे दुकान चालत रहावे म्हणुन ते कायम नवनविन कल्पना आपल्या उत्पादनात जोडत जातात व आपले उत्पादन कायम ग्राहकांना मोहवत ठेवेल याची काळजी घेतात. ग्राहकाला पण वाटते आपले जुने मॉडेल जुने झाले व नविन घ्यायला हवे.  या कंपन्यांचा ग्राहकच हे दुकान कायम चालत राहिल याची काळजी घेतो.  एका ग्राहकाच्या चुकीमुळे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यावर म्हणुनच नोकियाने आपल्या सर्व तत्सम बॅटर्‍या बदलून देण्याची तयारी दाखवली. हे सर्व करताना पानपान भराच्या जाहिराती दिल्याचे आपल्याला आठवतच असेल. त्यांनी त्यांच्या जाहिरातीत आपले ग्राहक तुटणार नाहीत याची व्यवस्थीत काळजी घेतली. चुक ग्राहकाची आहे हे माहित असुनही त्यांनी आपले नाव खराब होवू नये व ग्राहक टिकावा याची संपूर्ण दक्षता घेतलीच.
          या विरुद्ध परिस्थीती आपल्या भारतीय उत्पादनांची आहे हे सांगताना खेद होतो. ग्राहक हा या स्वदेशी कंपन्याचे उत्पादन विकत घेण्या पर्यंत राजा असतो, त्यानंतर मात्र त्याला एखाद्या भिकार्‍या सारखे या कंपन्यांना फोन किंवा इतर मार्गाने भिक मागावी लागते. या कंपन्यांना आपल्या उत्पादनातल्या तृटी दुरुस्त करुन देण्यात व ग्राहक टिकावा असे वाटतच नाही. उदाहरणार्थ: आपण Videocon या कंपनीचे कोणतेही उत्पादन विकत घेवून बघा, ते चांगले चालले तर आपले नशिब अन्यथा आपल्याला यांव्या दारात भिक मागत फिरावे लागेल.
          स्वदेशी जागरण मंचाच्या प्रेरणेने आपले बरेच ग्राहक स्वदेशी उत्पादन विकत घ्यायला लागले. या मागच अर्थशास्त्र पटल्यामुळेच त्यांनी भारतीय उत्पादनेच विकत घ्यायची असे ठरवले. खरतर जागरण मंचामुळे आपल्या कंपन्यांना एक चांगली संधी चालुन आली होती पण संधीचे सोने करण्या ऎवजी ग्राहकाच्या माथी निकृष्ट उत्पादने मारण्याचा व पैसे कमावण्याचाच व्यवसाय या कंपन्यांनी सुरु केल्याचे आढळेल.  या व्यवसाय पद्धतीमुळे बर्‍याच चांगल्या भारतीय उत्पादनांकडे ग्राहक पाठ फिरवू शकतो याची या कंपन्यांना जाणीव असल्याचे दिसत नाही.
           अशा या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारात काही चांगली उत्पादनेही आहेत व यांचा ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहे हेही दखल घेण्यासारखे आहे. यात प्रामुख्याने विको वज्रदंती तसेच पितांबरी सारखी चांगली उत्पादने आहेत.  भारतातल्या मोठ्या कंपन्या जागतीक दर्जाची कामगीरी करित असतांना सामान्य ग्राहकाकडे भारतीय कंपन्या दुर्लक्ष करताहेत यात त्यांचेच नुकसान अधिक संभवते.