बुधवार, २९ जुलै, २०१५

२६ जुलै : एक प्रवास.

२६ जुलै २००५ .
बघता बघता दहा वर्षे झालीत.
मनावर कोरली गेलेली एक तारीख.
लाडकी मुंबापुरी जलमय झाली होती.
एक वाजल्या नंतर पावसाने जोर धरला व दुपारी तीन वाजता मी घराच्या दिशेने निघालो, सोबत हात धरून एक एकदाच भेटलेली गुजराती "बहन" होती.
घाटकोपरच्या पंतनगर मधुन हाय वे ला येऊ व जमेल तसे घरी पोहोचू इतका साधा हिशोब होता.
पण........
पंतनगरला अर्धा किलोमीटर चालताना पाण्याचा वाढलेला जोर व पातळी (थोड्याच वेळात छाती एवढे) बघता, २७ तारीख दिसेल याची खात्री वाटेना.........
अन.............
मन म्हणत होत....... हरायच नाही............ जगायच आहे ........ खुप जगायच आहे........
आपल्या मागे तिघी आहेत...........
त्यांच काय होईल.
या एकाच विचाराने फक्त जीव वाचेल याची काळजी घेत पुढे चालत राहिलो.
अन,
बातमी आली
पुढच्या गटारात सात जण वाहून गेलेत..... पुढे जाऊ नका.
अरे बापरे.......... आता काय होणार........
समोर एक BEST ची बस दिसली, तो पर्यंत मोबाईल पाणी गेल्याने बंद पडलेला.
कस तरी बस मधे चढलो.
रात्री अकरा वाजता बस मधिल एकाचा मोबाईल वाजला, अन जिवात जीव आला.
पाण्याची पातळी वाढतच होती, आता फक्त सिट वरच पाणी यायचे बाकी होते.
अन त्या भल्या माणसाने आवाज दिला, "मेरा मोबाईल चालु है किसीको अपने घर फोन करना है तो मेरा मोबाईल ले सकते हो."
घरी फोनवर "सांगितले मी जीवंत आहे, काळजी नसावी." ११.२० झाले होते तेंव्हा.
बस इतकेच बोलून फोन ठेवला अन....
परत पाऊस वाढला.
धिर सुटत चालला होता.....
बायको अन मुलींचे चेहरे समोर येत होते....
अन
समोर येत होते आणखी एक चित्र.........
स्वत:च्या फॊटॊला हार घातला आहे अन सगळे रडत आहेत.....
पण तसे होणे नव्हते...
पाण्याची पातळी रात्री तीन नंतर कमी होत गेली, थोड्या वेळातच "दोन जण डोक्यावर डबे घेऊन बसकडे येताना दिसले.
संकटात असावे या समजातुन त्यांना हात पुढे केला तर कळले "ब्रह्मकुमारी"चे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी डब्यात आमच्या साठी खायचे साहित्य आणले आहे.....
रात्री तीन वाजता एक पोळी, भाजी आणी शिरा मिळाल्यावर म्हटले वाचलो.
सकाळी सहा वाजता घराच्या दिशॆने मार्गक्रमण सुरु केले, दहा वाजता ठाण्याला पोहोचलो, अठरा किलोमीटर चालत.
घरी पोहोचताच तिघींना पहातच बांध फुटला, अन ............
मनसोक्त रडलो..... तिघीना कवटाळून...... !
होय, जीव वाचल्याचा आनंद होता, पण किती लोक घरी पोहोचू शकले नाहीत याची काळजीही होतीच.
आज दहा वर्षांनी ...... बघितले तर ...... माणुस तसाच आहे ........ गटारे तुंबतील याची पुरेपूर काळजी घेणारा.............. अन महापालिकेला जबाबदार धरणारा........... !
परत असले दृष्य बघायला नको वाटते.
पण जोरदार पाऊस आला कि धडकी भरते व न कळतच आठवते २६ जुलै २००५.
अजय भांगे....
(२६ जुलैला मी फेसबुक वर पोस्ट केलेला लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा