रेल्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेल्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

घाम !

     मी ठाणे स्टेशन जवळ घर मिळाल्यामुळे स्वत:ला फारच भाग्यवान समजतो. घरुन सक्काळी सक्काळी कॉलेजला जाताना रिक्षा वाल्याच्या मुजोरिचा सामना करावा लागत नाही कि महानगरपालिकेच्या कृपेने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरुन जावे लागत नाही ! घराबाहेर निघताच लगेच फलाट क्रमांक एक वरुनच गाडी मिळते.
    पण काही कारणाने एक वरुन निघणारी गाडी चुकली तर ?
     तर मात्र त्याच नशिबाला दोष देण्याशिवाय व घामाघुम होण्याशिवाय माझ्या कडे पर्याय शिल्लक रहात नाही. कारण आपण सकाळच्या वेळेची ठाण्याला कोणत्याही पुलावरची गर्दी बघितली तरच माझे म्हणणे आपल्याला पटेल.
     गर्दीचा कोणताही विचार न करता रेल्वे प्रशासनाने ठाणॆ वाशी तसेच ठाणे पनवेल मार्ग खुला केलाय. त्यामुळे फलाट क्रमांक ३ व ४ ला एका वेळेस लोकल आल्यातर दोन्ही बाजुचे पुल गर्दीने तुडूंब भरुन जातात. फलाटा वरुन पुलावर चढणारे व पुलावरुन ३ व ४ वर उतरणारे प्रवासी अशा वेळेस कोणतीही शिस्त न पाळता पुढे जायचा प्रयत्न करित असतात. क्रमांक दोन वरुन फलाट क्रमांक तीनवर जायला या गर्दीमुळे जवळपास ३० मिनिटे वाया जातात. व आपल्या समोर ३ ते ४ लोकल सुटतात.  बरेचदा वाटते या परिस्थीतीत एखादा समाज कंटक भिती दाखवायला काहिजरी ओरडला तर पुलावरिल लोक सैरावैरा पळत सुटतील व होणार्‍या चेंगराचॆगरीत किमान ५०० लोक दगावतील. मागल्याच वर्षी फलाट क्रमांक ३ वर एक पाल अंगावर पडल्याने एक बाई जोरात किंचाळली होती व काय झाले हे लक्षात न घेता फलाट क्रमांक ३ व ४ वरुन लोकांनी सरळ रुळावर उड्या घेतल्याची घटना लोक विसरले नाहित. सुदैवाने मोठी प्राणहानी या वेळेस टळली होती.
      गर्दीच्या वेळेस दोन्ही पुलांवर रेल्वेला सुरक्षा रक्षक ठेवणे शक्य नाही कां ? कि रेल्वे प्रशासन एखादा अपघात घडावा याची वाट बघत आहे ?