रेडिओ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेडिओ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

मिडिया !

शेकडो चॅनल्स सर्फ करत असताना आपल्याला आवडेल असे काही दिसत नाही व उगाच आपण मिडियाच्या नावाने बोटे मोडत बसतो. मालिका असो किंवा बातम्या, नको नको ते दाखवले जाते. घरात वा समाजात कधिही न दिसणारी भांडणे किंवा भानगडी हे सर्व आपण कोणत्याही मालिकेत बघु शकतो. कालच कुठली तरी हिंदी मालिका बघत असतांना त्यातील कलाकार ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करित होते ते बघुन तर चॅनल बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. बातम्यांची पातळी तर बोलूच नये इतपत घसरलीय. चॅनल सुरु केले आहे तर ते चालवावे लागेल तर दाखवा जे काही शक्य आहे ते अशिच बहुदा मानसिकता असावी या चॅनल मालकांची.  TRP के लिए कुछ भी करेगा !
रेडिओ लावावा तर तेच, रेडिओ जॉकि नावाची नविन जमात असंबद्ध बडबड करण्यात तरबेज असते. मनात येईल ते वाट्टेल तितके बोलायचे व आपली वेळ संपली कि पुढच्याला बडबडण्यासाठी खो द्यायचा. हे सर्व चोवीस तास चालु द्यायचे.
समाजातही या सर्व मालिकांचे दुष्परिणाम दिसतात पण एक चांगला परिणाम पण झालाय ! ह्या शेकडो चॅनल्सना लागणारा कामगार वर्ग. एक चॅनल किमान दोनशे जणांच पोट भरते. एक मालिका तयार करताना स्पॉट बॉय पासुन सर्व कलाकार यांची संख्या २५० च्या वर जाते.  सर्व चॅनल्स धरलेत तर कमितकमी दोन ते तीन लाख माणसांचे पोट यावर अवलंबून आहे.
तर मालिका, बातम्या बघा अथवा बघू नका या सर्वांचे पोट भरतेय यात आनंद माना !

सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

प्रगति ?

बरेच वर्षांपूर्वी आमच्या गावात दूरदर्शन नव्हत. गावातल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्ति कडेच फोन असायचा.  मोबाईल नावाची गोष्ट कल्पनेच्या बाहेरची होती. सामान्य माणसाची कमाई मोजकिच असायची. वाण्याच्या दुकानात लेस, कुरकूरे वा तत्सम खाद्य पदार्थांची पाकिटे दिसत नव्हती. टेप रेकॉर्डर ज्याच्या घरी तो भाव खात असे. सामान्य माणुस रेडिओची वार्षिक लायसन्स फी भरुन मोठ्या आनंदाने गाणे ऎकत असे. शेतीवाणी पासुन बातम्या ऎकणे हा त्याचा सुखाचा खुराक असायचा. तरिही तो सुखी होता.
आज मुलांना कळायला लागल की त्यांना मोबाईल हवा असतो, iPod कानाला लावूनच दिवसाची सुरवात होते, घरात २४ तास चालणारे TV चॅनल्स आहेत, करमणूकीचे हजार मार्ग आहेत, बाजारात गेल्यावर गरजेच्याच नव्हे तर बिन गरजेच्या कित्येक वस्तु खरेदी करायची ताकद आहे. आठवून बघा आपला DVD Player शेवटचा कधी वापरला होता. घरातल्या सिडी किती दिवसात वापरल्या नाहीत. साध्या सिनेमा घरातली ढेकूण, डास नको व त्यामुळे मल्टी-प्लेक्स शिवाय सिनेमा बघवत नाही. तरिही आज आम्ही सुख शोधायला भिरभिरत्या नजरेने बुवा-बाबाच्या पायाशी लोळण घालतोय.
याला प्रगती म्हणायची ?
सहजच विचार करताना मला एका काकांची आठवण झाली. त्यांच्याकडे २२०० रुपयाचा जुना मोबाईल आहे. (ते आपला मोबाईल रात्री आठ ते सकाळी आठ बंद ठेवतात. त्यांच्या मते मोबाईल फक्त संवाद साधायला वापरायला हवा. त्यात कॅमेरा काय कामाचा ?) मोबाईल बदलणे त्यांना पटत नाही. त्यामुळे जुना मोबाईल खराब झाल्यावरच ते तो बदलणार आहेत.
आपण आपल्या कडे नविनतम वस्तु असावी या अट्टाहासापायी किती वस्तु न वापरताच किंवा फार कमी वापरुन बदलतो व या सगळ्या उलाढालीत किती पैसा व्यर्थ घालवतो. बर एक वस्तु विकत घेतल्यावर लगेच महिन्यातच त्यापेक्षा चांगली नविन आवृत्ती येते व आपण परत विचार करायला लागतो अरे थोडे थांबलो असतो तर ?
सुख कशात आहे ?